बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती बैठक उत्साहात संपन्न | कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय
अकोला (प्रतिनिधी) :
अकोला जिल्ह्यात येत्या काही दिवसांत बकरी ईद साजरी होणार असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता, एकोपा आणि सौहार्द अबाधित राहावा, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. अर्चित चांडक (भा.पो.से.) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४ जून रोजी दुपारी ४ वाजता अकोला पोलीस लॉन येथे शांतता समितीची विशेष बैठक पार पडली.
या बैठकीस विविध धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, नगरसेवक, स्थानिक मान्यवर, पत्रकार बांधव तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सतीश कुलकर्णी यांनी केले.
संवादातून समन्वय, सहकार्याचा संदेश
पोनि मनोज बहुरे (रामदासपेठ), पोनि नितीन लेव्हरकर (जुने शहर) यांनी उपस्थितांना आपल्या अनुभवातून बंदोबस्ताच्या रणनीती सांगितल्या. शांतता समिती सदस्यांनी देखील संभाव्य अडचणी आणि उपाय याबाबत आपली मते मांडली. बैठकीत सर्वच सदस्यांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
पोलीस अधीक्षकांचा स्पष्ट इशारा : अफवांवर कठोर कारवाई होणार
अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांनी नागरिकांनी याआधी दिलेले सहकार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत आगामी काळातही असे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.
यानंतर आपल्या भाषणात पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांनी स्पष्ट इशारा दिला की, “समाजात धार्मिक तेढ पसरवणाऱ्यांचा कोणताही धर्म नसतो. अफवा पसरवणाऱ्यांविरोधात पोलीस लाठीसह कायद्याची तलवार प्रहार करणार आहे.”
ते पुढे म्हणाले की, बकरी ईद शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असून, पेट्रोलिंग, वाहतूक व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, अतिक्रमण नियंत्रण या सर्व बाबींवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
MPDA अंतर्गत कारवाई, ७ मिनिटांत पोलीस प्रतिसादाचे उद्दिष्ट
सध्या दोन समाजविघातकांवर MPDA अंतर्गत कारवाई झाली असून, भविष्यात अशा कृत्यांना अजिबात पायबंद घालण्यात येणार आहे. पोलिसांचा आपत्कालीन प्रतिसाद वेळ ७ मिनिटांखाली आणण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.
शहरातील गोवंश तस्करी, वाहतूक अडथळे आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी विशेष पथक कार्यरत असून, अतिक्रमणावर देखील स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने कठोर पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात शांतता व ऐक्य जपण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – प्रशासनाचे आवाहन
पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना कोणतीही अनुचित घटना, गोंधळ अथवा संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष (112) वर संपर्क साधण्याचे आवाहन केले. “पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सांगता कृतज्ञतेने
कार्यक्रमाचे आभार पोनि गजानन धंदर (विशेष शाखा) यांनी मानले. सूत्रसंचालन पोहवा गोपाल मुकुंदे यांनी केले. या बैठकीच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक गणेश जुमनाके व गुप्तचर विभागातील सर्व अंमलदारांनी विशेष मेहनत घेतली.