
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या मागण्या मान्य..
स्थानिक: मुंबई येथे दिनांक २०जुलै रोजी पावसाळी अधिवेशन मुंबई येथे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये गायरानधारक / शासकीय / महसूल जमिनीवरील अतिक्रमणधारकांचा राज्यव्यापी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रभरातून वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच अतिक्रमण धारक शेतकरी या मोर्चामध्ये भरपाऊसातही मोठ्या संख्येनी हजेरी लावली. गायरान, शासकीय, महसूल जमिनी, अतिक्रमण धारकांच्या नावे नियमाकुल करा. गायरान धारक भूमिहीनांना शेतीचा ७/१२ द्या. बेघर अनुसूचित जाती जमाती, आदिवासी भटक्या भूमिहीनांना घरकुल योजनेचा लाभ देता जागा सरसकट ७/१२ मालकी हक्काचा करा या मोर्चाच्या प्रमुख मागण्या होत्या.
अतिक्रमणाच्या माध्यमातून लोकांना बेघर करण्याचा सरकारचा जो डाव सुरू आहे या सगळ्याच्या विरोधात या मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठविला गेला. शितल साठे,सचिन माळी यांच्या आंबेडकरी गितांमुळे लोकांमध्ये स्फुरण चढले. मुंबई येथील सेंट झेवियर्स कॉलेज पासून या मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने ॲड. प्रकाश आंबेडकर यांना विधानभवनात आमंत्रित केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या सगळ्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली व शासनाने या मागण्या मान्य केल्या त्यात प्रामुख्याने खालील मागण्या होत्या.

१. घरांसाठी केलेलं अतिक्रमण पाडण्यात येणार नाही.
२. अतिक्रमण करून बांधलेल्या घरांचे पट्टे त्यांच्या नावावर करण्यात येतील.
३. अतिक्रमण करून केलेली शेती उध्वस्त केली जाणार नाही, वा येणाऱ्या पिकांचा लिलाव होणार नाही. ज्याने शेती केली त्यालाच ते पीक मिळेल.
४. शेतीचे पट्टे शेती करणाऱ्यांच्या नावावर करण्याची प्रक्रिया आपल्याकडून सुरू केली जाईल. यासाठी अजून लढावं लागणार आहे.
५. SRA योजने अंतर्गत ज्यांच्या झोपड्या पाडण्यात आल्या व त्या प्रकल्पांचे बांधकाम रखडलेले आहे अशी लोकं बेघर असल्यासारखी आहेत. अशी सर्व प्रकल्प MHADA, MMRDA, CIDCO अशा सरकारी संस्थांकडे वर्ग करण्यात येतील.
६. SRA अंतर्गत बिल्डरकडून घराचे भाडे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. २ – ३ वर्ष काही बिल्डरांनी झोपडीधारकांना भाडे दिलेले नाही. त्यामुळे त्यांना बेघर होण्याची वेळ आलेली आहे. अशी प्रकल्प ज्या सरकारी संस्थेकडे जातील त्या संस्थेने हे भाडे थकबाकी सकट झोपडीधारकांना देण्याचे ठरले.
७. BDD चाळींच्या संदर्भात चर्चा पूर्णत्वास पोहोचली नाही. परंतु पुढच्या बैठकीत हा मुद्दा पुन्हा मांडला जाईल.

तुफान पावसात उसळलेल्या तुफान गर्दीचा हा महामोर्चा यशस्वी झाल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले. मागण्या मान्य केल्याबद्दल शासनाचे व सहकार्य केल्याबद्दल सर्व नागरिकांचे, मुंबई पोलीस व पोलीस आयुक्त यांचे आभार यावेळी त्यांनी व्यक्त केले. मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, अंजलीताई आंबेडकर, अशोकभाऊ सोनोने, किसन चव्हाण, डॉ. धैर्यवर्धन पूंडकर, प्रियदर्शी तेलंग, सर्वजित बनसोडे, सिद्धार्थ मोकळे, अरुंधतीताई शिरसाठ, विष्णू जाधव, नीलेश विश्वकर्मा, राजेंद्र पातोडे, अमित भुईगळ, शमीभा पाटील, अक्षय बनसोडे, चेतन गांगुर्डे, डॉ. क्रांती सावंत, प्रा. निशा शेंडे, अबुल हसन खान, सुनीताताई गायकवाड, परमेश्वर रनशुर आदी नेते पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
