
स्थानिक:अकोला, ग्रामीण संस्कृतीची खरी ओळख म्हणजे लोककला. ती लोककला टिकली पाहिजे, ती लोककला जपली पाहिजे. या उद्देशाने वऱ्हाड शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्था लोणी, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई व श्री शिवाजी कला महाविद्यालया यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथे तिसरे वऱ्हाड लोककला साहित्य संमेलन अतिशय थाटात संपन्न झाले.
यावेळी संमेलनाचे अध्यक्ष डॉ गणेश चंदनशिवे हे होते. शाहिरी काव्यामध्ये महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास मांडला आहे. एकनाथांनी भारुडामधून मनोरंजन सोबतच समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले आहे. असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

हल्या हाल्या दुदू दे या कादंबरीचे लेखक ज्येष्ठ कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. शेतकऱ्यांचा मुख्य सन पोळ्याला महादेवाच्या गाण्यातून, उताऱ्यातून शेतकरी कसे शेतीचे दुःख मांडतो, तसेच पंचमीच्या सणाला ठाव मांडून बाऱ्या मध्ये म्हटली जाणारी गाणी कशी मनाचा ठाव घेत होती हे सांगितले. भुलाबाईची गाणी, फुगडीगीते, लग्नगीते, पाळणागीते, हे खरे प्राचीन लोकसाहित्य असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे व डॉ केशव देशमुख हे होते. या संमेलनाची सुरवात डाँ .आनंदा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली NCC पायलेटींग व प्रा. भुतेकरांच्या मार्गदर्शनात NSS च्या ढोल पथकाव्दारे पारंपारिक पद्धतीने झाली. पाहुण्यांचे स्वागत विठ्ठल वाघांनी लिहिलेत्या वऱ्हाडी स्वागत गीताने झाली. या गिताचे सादरीकरण प्रा. हर्षवर्धन मानकर व त्यांना सोबत रागिनी खोडवे, श्रुती बुडखले, वैष्णवी लोंढे,ऋतुजा ठाकरे, तबला प्रवीण वंडाळे ह्या विद्याथ्यांनी केले.

संमेलनाच्या विचारपिठावर जय भवानी मंडळ अकोला यांनी देवीचा गोंधळ सादर केला. या गोंधळाला रसिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दिव्यांग सोशल फाऊडेशन अकोला तर्फे वैभवी गवई यांनी अतिशय सुंदर लावणी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. गुरुदेव भजन मंडळ राहित व मोरगाव यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने सादर केली. मथुरा लभाण लोकनृत्य मंडळ पाळोदी यांनी लोकनृत्य सादर केले. तसेच भारुड सुद्धा झाले.

समारोपीय सत्रामध्ये भाषा समिती विषयक ठराव पारित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गणेश चंदनशिवे, प्रा डॉ हेमंत खडके, संमेलनाचे आयोजक डॉ रावसाहेब काळे डॉ अंबादास कुलट हे विचार पिठावर उपस्थित होते. तसेच संमेलनामध्ये डॉ गजानन नारे, प्रा सदाशिव शेळके, डॉ मधु जाधव, आबासाहेब कडू, प्रा महादेव लुले, प्रा संजय कावरे, सीमा शेठे, मधुराणी बनसोड, विद्या बनाफर, संदीप देशमुख, विठ्ठल कुलट, हिंमत ढाले, तुळशीराम बोबडे, सुहास उगले, डॉ . पाटनकर मॅडम, डॉ . विनय दांदडे , प्रा. निलेश कवडे , प्रा. किशोर देशमुख , प्रा. वतारे ,हे यावेळी उपस्थित होते.